सोलापूर : अक्षय्यतृतीयेचे आणि आंब्याचे विशेष असे नाते आहे आणि आंबे म्हटले, की पहिल्यांदा डोळ्यांसमोर कोकणच उभे राहते. मग भले आंब्याचे पीक देशाच्या, राज्याच्या अनेक भागांमध्ये येत का असेना? कोकणातील या वैभवाची भुरळ सगळ्यांनाच पडते; पण त्यातून प्रेरणा घेऊन स्वतःच्या प्रदेशातही तसे निर्माण करण्याची किमया फार थोड्या साधते. बाभूळगाव (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील एका निवृत्त शिक्षकाने ही किमया साध्य केली आहे. राजाराम वाघमारे असे त्यांचे नाव असून, त्यांनी आठ वर्षांच्या अथक परिश्रमांतून सोलापुरातल्या माळरानावर कोकणासारखी आमराई उभी केली आहे. त्यांच्या केशर आंब्याच्या बागेत यंदा पहिल्यांदाच बहर आला असून, अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर फळांची विक्री सुरू झाली आहे.
वाघमारे हे राज्य पुरस्कारप्राप्त निवृत्त शिक्षक. कोकणात स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या शाळेतून ते मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. नोकरीच्या निमित्ताने कोकणातच निम्मे आयुष्य घालवलेल्या वाघमारे यांच्यावर तेथील निसर्ग आणि आंब्याच्या बागांचा प्रभाव पडला होता. मुळातच त्यांना लहानपणापासूनच वृक्षलागवड-संवर्धन, पर्यावरण संरक्षण या गोष्टींमध्ये रस होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या सेवा काळात कोकणातील अनेक गावांत विद्यार्थांची श्रमसंस्कार शिबिरे घेऊन ग्रामस्वच्छता, जलसंधारण आणि वृक्षलागवड असे उपक्रम राबवले. त्यातूनच त्यांना आपल्या गावाकडच्या शेतात आमराई विकसित करण्याची कल्पना सुचली. त्यांनी निवृत्तीनंतर गावाकडचा रस्ता धरला तो हे स्वप्न डोळ्यांसमोर ठेवूनच.
स्वतःची आमराई असावी या स्वप्नामागे आणखी एक हेतू होता तो पर्यावरणसंरक्षणाचाही. हे स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात आणले तीन एकर क्षेत्रावर केशर आंब्याची लागवड करून. या क्षेत्रावर त्यांनी ६०० झाडे लावली आणि ती प्रतिकूल परिस्थितीत, प्रसंगी पाणी विकत घेऊनही जगवलीही. गेल्या वर्षी पडलेल्या मोठ्या दुष्काळावेळी स्वतःच्या पेन्शनमधील ८० हजार रुपयांचे पाणी विकत घेऊन त्यांनी बाग वाचवली. आज त्यांचे वय ७१ वर्षे आहे. वयोमानानुसार फारशी धावपळ करता येत नसली, तरी बागेतील केवळ कष्टाच्या कामांसाठीच त्यांनी मजूर लावले आहेत. बाकीची दैनंदिन देखभालीची कामे ते स्वतःच करतात. त्याचा त्यांना आरोग्य चांगले राहण्यासाठीही फायदा झाल्याचे ते सांगतात. एवढेच कशाला, बागेला पाणी देण्याचे कामही ते स्वतःच करतात. त्यासाठी वीज रात्री-अपरात्री केव्हा येईल तेव्हा विहिरीवरील मोटार सुरू करायलाही ते हौशीने जातात. अक्षय्यतृतीयेच्या पूर्वसंध्येला त्यांच्या बागेतील केशर आंब्याला स्थानिक बाजारपेठेत प्रति डझन २०० ते ३०० रुपये दर मिळाला आहे.
वास्तविक, वाघमारे यांच्या कुटुंबाला उत्पन्नासाठी शेती करण्याची आवश्यकता नाही; मात्र कोकणाच्या प्रभावामुळे पाहिलेले स्वप्न आणि आपल्या भागात पर्यावरणरक्षणाचा ध्यास यामुळे त्यांनी ही आमराई लावली आणि कष्टाने वाढवलीही. आपल्याला स्वप्नपूर्तीचे समाधान असल्याची भावना त्यांनी
‘बाइट्स ऑफ इंडिया’शी बोलताना व्यक्त केली. जणू काही अक्षय्य आनंदाचा ‘केशरी’ ठेवाच त्यांना या आमराईच्या रूपाने मिळाला आहे.